मुंबई : महाराष्ट्राचा विकासदर ५.७ टक्के राहण्याचा अंदाज आहे. तसेच, राज्याच्या स्थूल उत्पन्नात २०१८-१९ या वर्षाच्या तुलनेत दोन लाख ४५ हजार ७९१ कोटी रुपयांची वाढ होण्याची अपेक्षा राज्याच्या २०१९-२०च्या आर्थिक पाहणी अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. राज्य विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून, अर्थमंत्री अजित पवार यांनी पाच मार्च २०२० रोजी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. सहा मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.
उद्योग क्षेत्राच्या वाढीचा दर ३.३ टक्के, तर सेवा क्षेत्राच्या वाढीचा ७.६ टक्के राहील, असे या अहवालात म्हटले आहे. कृषी आणि संलग्न क्षेत्राच्या वाढीचा दर ३.१ टक्के राहील आणि खरीप हंगामातील पिकांमध्ये तृणधान्यांचे उत्पादन नऊ टक्क्यांनी, कडधान्यांचे उत्पादन तीन टक्क्यांनी, तेलबियांचे उत्पादन एका टक्क्याने, तर कापसाचे उत्पादन २४ टक्क्यांनी वाढेल असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
रब्बी पिकांमध्ये तृणधान्यांच्या उत्पादनात ४३ आणि कडधान्यांच्या उत्पादनात २३ टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज आहे. तसेच फलोत्पादन क्षेत्रात २४२.७१ लाख टन उत्पादन मिळेल, असा अंदाज आहे. उसाच्या उत्पादनात ३६ टक्क्यांची आणि रब्बी हंगामातील तेलबियांच्या उत्पादनात २४ टक्क्यांची घट होण्याचा अंदाज या अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे.
(राज्याचा संपूर्ण आर्थिक अहवाल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)